Home ठळक बातम्या कल्याणातील वाहतूक कोंडी : नागरिक, प्रसिध्दीमाध्यमं आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यानंतर अखेर केडीएमसी प्रशासन...

कल्याणातील वाहतूक कोंडी : नागरिक, प्रसिध्दीमाध्यमं आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यानंतर अखेर केडीएमसी प्रशासन झाले जागे

कल्याण दि.19 जुलै :
कल्याण शहर आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या गंभीर प्रश्नांबाबत मुके,बहिरे आणि आंधळेपणाची भूमिका घेतलेल्या केडीएमसी प्रशासनाला अखेर जाग आली आहे. शहरातील नागरिकांकडून झालेला उद्धार, प्रसिध्दी माध्यमांकडून झालेली चौफेर टीका आणि लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या रेट्यानंतर केडीएमसी प्रशासनाला या प्रश्नांचा साक्षात्कार झाला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी काल शहर पोलीस, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र केडीएमसीसह संबंधित प्रशासकीय यंत्रणा या आदेशाची कितपत अंमलबजावणी करते की त्याला केराची टोपली दाखवते हे पाहावे लागणार आहे. (Traffic Congestion in Kalyan: KDMC administration finally wakes up after protests by citizens, media and public representatives)

गेल्या दोन आठवड्यांपासून कल्याण शहर परिसर असो की स्टेशन परिसर असो, या दोन्ही ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होत आहे. ज्याचा फटका सर्वसामान्य करदाते नागरिकांसह शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या रुग्णांना बसत आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न इतका गंभीर झाला की तो हाताबाहेर गेला असा वाटण्याइतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला आणि त्यातील मस्तवाल अधिकारी वर्गाला जणू त्याच्याशी काही देणेघेणेच नाहीये. अशा आविर्भावात केडीएमसीसह इतर प्रशासनातील हे सर्व अधिकारी मूग गिळून गप्प बसले होते. जनाची नाही पण किमान मनाची तरी थोडी फार लज्जा बाळगून आणि ज्या करदात्या नागरिकांमुळे दर महिन्याला आपला पगार होतो, याची तरी किंचितशी जाण त्यांनी ठेवायला पाहिजे होती. मात्र संपूर्ण शहराला वाऱ्यावर सोडून ही प्रशासकीय यंत्रणा आपल्याच धुंदीत मग्न झाली होती.

आणि मग शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावर या प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत ‘म आणि भ’ च्या भाषेत यथेच्छ उद्धार सुरू केला, प्रसिध्दी माध्यमांची चौफेर टीका सुरू झाली आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकाऱ्यांनीही रेटा लावल्यानंतर हे कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झाले. आणि काल सर्व प्रशासकीय यंत्रणेची बैठक लावत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काही आदेश काढले.

प्रशासनाने हे आदेश काढले असले तरी त्यांची अंमलबजावणी कशी आणि किती दिवस होणार हा खरा प्रश्न आहे. की नेहमीप्रमाणे पुढील काही दिवस हा कारवाईचा फार्स चालणार. आणि त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होईल याची उत्तरं येत्या काळात आपल्याला मिळतील.

मात्र या शहरांप्रती प्रशासकीय यंत्रणांच्या या मुक्या, बहिऱ्या आणि आंधळेपणाच्या भूमिकेमुळे एक नागरिक म्हणून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत…

मुळात वाहतुकीचा इतका गंभीर प्रश्न निर्माण होईपर्यंत प्रशासन कशाची वाट पाहत होते?

करदात्या नागरिकांसाठी आपली काही जबाबदारी – उत्तरदायित्व आहे असे यांना वाटत नाही का ?

केवळ पगार घेण्यापुरता आणि वेळकाढूपणा करण्यासाठी अधिकारी वर्ग आहे का ?

कल्याण डोंबिवली शहरांशी, इथल्या समस्यांशी या अधिकारी वर्गाचे काही देणे घेणे नाही का?

केवळ कार्यालयात बसून कागदी आदेश देण्यासाठीच या अधिकाऱ्यांचे अस्तित्व आहे का?

2 कॉमेंट्स

  1. Broken drainge chamber on road, illegal speed breakers, pathholes, no working of traffic signal, illegal openings for dividers, Shop keeper encroachment on foot path, poor footpath for public walking. Request for Commissioner to walk for 5 min. around Commissioner banglow and see the actual condition of roads, chowks, speed breakers, footpath.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा