
कल्याण दि.8 मार्च :
मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनेही महिलांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना राबवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे करण्यात आली आहे. कल्याण शहर संघटक चेतना रामचंद्रन यांच्यासह महिलांच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत ही मागणी केली.
मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण अंतर्गत नवसंजीवनी योजना, राजकन्या योजना, कन्यादान योजना, जिजाऊ महिला आधार आदी योजना राबविल्या जातात. याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनेही महिलांसाठी असणाऱ्या या सर्व योजना सुरू करण्याची मागणी चेतना रामचंद्रन यांनी केली आहे. तसेच या मागण्यांचे एक निवेदन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले.
यावेळी कल्याण शहराध्यक्षा शीतल विखणकर, जिल्हा सचिव वासंती जाधव, शहर सचिव अर्चना चिंदरकर, उपशहराध्यक्ष सुरेखा महाजन, शाखाध्यक्षा अमिता सिंग आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.