
जागतिक दर्जाचे उपचार आता कल्याणात उपलब्ध
कल्याण दि.15 फेब्रुवारी :
कॅन्सर म्हणजेच अर्थात कर्करोग. आजच्या घडीला तरुणांपासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत अनेक जण या आजाराला बळी पडत आहेत. अशावेळी कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आयसीटीसी) हे कॅन्सरग्रस्तांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. गेल्या 4 महिन्यांच्या कालावधीत कॅन्सरमुळे गंभीर झालेल्या तिघा रुग्णांना जीवदान देण्यात इथल्या डॉक्टरांना यश आले आहे.
रुग्णासह नातेवाईक आणि कुटुंबीयांची फरफट थांबली…
आजच्या काळामध्ये डायबेटिसनंतर लोकांमध्ये कोणता आजार मोठ्या प्रमाणात पसरत असेल तर तो कॅन्सर. अगदी 26 वर्षाच्या तरुणापासून ते 80 वर्षांच्या वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वानाच या कॅन्सरचा विळखा पडत चालला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत कल्याण शहरात कॅन्सर रुग्णांसाठी कोणतेही उपचार केंद्र किंवा रुग्णालय अस्तित्वात नव्हते. त्यामुळे बहुतांश लोकांना मुंबईतील मोठमोठ्या रुग्णालयांची वाट धरावी लागायची. ज्यामध्ये जाण्या येण्यामध्ये रुग्णाला तर मोठा त्रास व्हायचाच. मात्र त्याचसोबत त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांची आर्थिक, मानसिकदृष्ट्या अधिकच फरफट व्हायची.
कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर(आयसीटीसी) ठरतंय आशेचा किरण…
या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. अमित घाणेकर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या बैल बाजार परीसरात सुरू झालेलं इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये (आयसीटीसी) हे एक आशेचा किरण ठरताना दिसत आहे. ग्लोबल स्टँडर्ड उपचार पद्धती, रुग्णामध्ये पसरलेले कॅन्सरचे प्रमाण आणि त्यादृष्टीने परिणामकारक केले जाणार उपचार या त्रिसुत्रीच्या बळावर याठिकाणी रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसत असल्याची माहिती आयसीटीसीचे मुख्य डॉ. अमित घाणेकर यांनी दिली. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांत अतिशय गंभीर अवस्थेत आलेले तीन रुग्ण आज मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले आहेत. सुरुवातीला या रुग्णांना याठिकाणी स्ट्रेचरवर आणले गेले होते, तेच रुग्ण आता स्वतःहून चालत याठिकाणी पुढील उपचारासाठी येत असल्याचेही डॉ. घाणेकर यांनी सांगितले.
कॅन्सरला सामोरे जाऊन योग्य पद्धतीने लढण्यातच शहाणपण- डॉ. अमित घाणेकर
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर पाठ दाखवून पळण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन योग्य पद्धतीने लढण्यातच शहाणपण आहे. या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये ड्रग्ज, डोस आणि त्याची वेळ हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कर्करोग तज्ञाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही आयसीटीसीचे प्रमूख डॉ. अमित घाणेकर यांनी केले आहे.किमो थेरपीचे नाव ऐकून घाबरून जाण्यापेक्षा आपल्या ट्रीटमेंटमध्ये कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती घेऊन योग्य ते निर्णय करणे ही काळाची गरज बनली आहे.