Home ठळक बातम्या मुदत संपलेला आयाआरबीचा दहिसर टोलनाका बंद करा – मनसे आमदार प्रमोद (राजू)...

मुदत संपलेला आयाआरबीचा दहिसर टोलनाका बंद करा – मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील

ठाणे दि.13 ऑगस्ट :
ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी कंपनीचा दहिसर टोलनाका बंद करण्याची मागणी मनसेचे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी लेखी निवेदन देखील मंत्री भुसे यांना दिले आहे. (Close expired Dahisar toll naka of IRB – MNS MLA Pramod (Raju) Patil)

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग-४ (नवीन ४८) यावर अवजड आणि हलक्या वाहनांकडून आयआरबीकडून टोल वसूल केला जात आहे. या टोलनाक्याची मुदत २०१९ मध्ये संपली होती. परंतु एमएसआरडीसीकडून मुदतवाढ देण्यात आली. मात्र टोलवसुलीसाठी रस्ता पूर्ण आणि सुस्थितीत असणे आवश्यक असते. परंतु या महामार्गाची दुरवस्था झाली असून जागोजागी भले मोठे खड्डे, गटारांची व्यवस्था नाही, कलव्हर्ट(मोऱ्या) नाहीत. तसेच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचलेले असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीही होत असल्याचे आमदार राजू पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच या महामार्गावरील अपघातांमध्ये अनेकांनी जीव गमावले असून कित्येकजण जखमी झाले आहेत. सद्यपरिस्थितीत महामार्गाच्या चार लेन कार्यरत नसतानाही टोलवसुली मात्र जोरात सुरू असल्याचे सांगत एमएसआरडीसी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी केला आहे.

महामार्गावरील समस्यांबाबत मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष दौरे करून रस्ता रुंदीकरण, दुरुस्ती, कल्व्हर्ट करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावेळी आयआरबीचेही अधिकारी उपस्थित होते. मात्र त्यानंतर अद्यापही परिस्थिती जैसे थे असून तातडीने चौकशी करून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हा दहिसर टोल तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा