
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतः सर्व यंत्रणासोबत समन्वय
मुंबई दि.23 एप्रिल :
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून मार्गदर्शन करत आहेत.
श्रीनगर येथे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे.
या घटनेतील संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान आज दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी मुंबईला निघेल.
पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी 6 वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल.
तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान 1 वाजून 15 मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल.