Home ठळक बातम्या महायुती सरकारसोबतच आपल्याकडूनही कपिल पाटील यांना कायम ताकद मिळणार : वनमंत्री गणेश...

महायुती सरकारसोबतच आपल्याकडूनही कपिल पाटील यांना कायम ताकद मिळणार : वनमंत्री गणेश नाईक

केंद्रीय राज्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

भिवंडी, दि.2 मार्च :
प्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंग येत असतात. मात्र, आता कपिल पाटील हे सतर्क आहेत. त्यांना समाज जीवनात मानाचे स्थान असून, राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळखणारा वर्ग आहे. माझ्यासह महायुतीचे सरकार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना कायम ताकद देईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी काल शनिवारी येथे दिली. कपिल पाटील यांना माझा आशीर्वाद कायम राहील, असेही गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. (Along with the MAHAYUTI alliance government, we also support Kapil Patil Will get strength: Forest Minister Ganesh Naik)

भारतीय टेनिस क्रिकेट विश्वात सर्वात मोठी असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भिवंडीच्या माणकोली येथील श्री गुरुदत्त चवठा हिरवा मैदानावर शानदार उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी गणेश नाईक बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली फटकेबाजी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. या स्पर्धेत विजेत्या आणि भाग्यवान प्रेक्षकांना दोन फोर व्हिलर आणि ५१ बाईक बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघासह ठाणे जिल्ह्याच्या विकासात कपिल पाटील यांचे योगदान महत्वाचे आहे. जिल्हा परिषदेच्या सभापतीपासून केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंतचा कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास पाहिला आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच समाजाच्या विविध स्तरांतही त्यांना मानणारा वर्ग आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळख निर्माण केली. तसेच देशभरात पंचायती राज व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा नेतृत्व करीत देशाचा सन्मान वाढविल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.

तर राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध विकास सुरू केला आहे, असे नमूद करीत गणेश नाईक यांनी आमदारकी-खासदारकी अळवावरचे पाणी असते. पण प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारबरोबरच माझ्याकडून कपिल पाटील यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही गणेश नाईक यांनी दिली.

पद असो वा नसो, आपण जनतेच्या सेवेसाठी कार्यरत – माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
ग्रामीण भागातील खेळाडूंना आयपीएल वा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळावी, या दृष्टीकोनातून २००५ मध्ये क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भव्य बक्षीसे, चुरशीच्या क्रिकेटमुळे या स्पर्धेची देशात ओळख निर्माण झाली आहे. ५१ बाईक आणि २ मोटारी अशी बक्षीसे भारतात प्रथमच या स्पर्धेत असावीत, असे कपिल पाटील यांनी सांगितले. तसेच ठाणे जिल्ह्याबरोबरच भिवंडीच्या विकासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री तसेच ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी आशीर्वाद द्यावा, अशी विनंती कपिल पाटील यांनी केली. पद असो वा नसो, आपण जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहोत, असे कपिल पाटील यांनी सांगितले.

या वेळी कोनगाव येथील राजू हेंदर म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे मंत्री गणेश नाईक व कपिल पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आले. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी भव्य क्रिकेट स्पर्धा भरविली जाते. यंदाही भाजपा, कपिल पाटील फाउंडेशन, सिद्धिविनायक अंजुर, जॉयकुमार युवा प्रतिष्ठान, एकविरा स्पोर्ट्स, गुरुदत्त चवठा हिरवा, दिवा स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या या केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक २०२५ स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि आकाशात फुगे सोडून स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात गणेश नाईक बोलत होते. या वेळी प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, वरुण पाटील, हेमंत घरत, स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख प्रताप पाटील, राम माळी, भानुदास पाटील, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा